मुंबई, 17 जुलै : राज्य सरकारच्या विविध योजनांचा राज्यात बोजवारा उडाला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवेदनामध्ये विविध मुद्द्यांना स्पर्श करत समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 'केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. मात्र या योजनेचा राज्यात बोजवारा उडाला आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची ही घोषणा होती. या अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. ते अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत असे हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत किती उदासीन आहे हे यावरुन लक्षात येते,' अशी टीका करत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
'सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणाऱ्या लाभांपासून विविध कारणांमुळे 50 लाखांपेक्षा जास्त कुटुंब वंचित आहेत. अशा अनेक योजनांपासून आज शेतकरी आणि त्यांची कुटुंब वंचित आहे. याला पूर्णपणे केंद्रातील आणि राज्यातील सरकार जबाबदार आहे,' असा आरोप या निवेदनामध्ये राष्ट्रवादीने केला आहे.
'शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये अनुदान देण्यात यावं'
राज्याच्या काही भागात पहिला पाऊस झाल्यानंतर मोठा खंड पडला, तर राज्याच्या काही भागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 17 जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची सुद्धा वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपयांचे अनुदान शासनाने जाहीर करावं, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
भाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT