मुंबई, 7 ऑक्टोबर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रानवे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात राज्य सरकारवर टीका करताना हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनीसारखं असल्याचा शेरा मारला होता. महाराष्ट्रातलं शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल. ते आम्ही पाडणार नाही, असं दानवे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला उचलून धरत राष्ट्रवादी नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पलटवार केला आहे. "हो आहोत आम्ही अमर अकबर अँथनी", असं म्हणत अनिल देशमुख यांनी त्यांना twitter वर प्रत्युत्तर दिलं आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी फेक अकाउंट उघडण्यात आल्याचं तपासातून पुढे आल्यानंतर त्यावर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर थेट आरोप केले होते. सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्याबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकूनच पडेल, आम्ही नाही पाडणार, असं वक्तव्य केलं.
महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते ऐकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल: @raosahebdanve pic.twitter.com/AXgwPIXtJR
— Office of Raosaheb Patil Danve (@raosaheboffice) October 7, 2020
या ट्वीटला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत आणि कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो असं म्हटलं आहे.
.@raosahebdanve म्हणाले की, #महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 7, 2020
यापूर्वीही अनिल देशमुखांनी भाजपवर आरोप करत माफीची मागणी केली होती. 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एका राजकीय पक्षाने सुपारी उचलली होती. या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राची बदनामी केली आहे. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केली. मुंबई पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजप नेत्यांची मजल गेली होती. त्यामुळे भाजपने राज्याची माफी मागितली पाहिजे', अशी मागणीही अनिल देशमुखांनी थेट भाजपकडे केली होती.
'सुशांत सिंह प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट काय आहे, याची वाट आम्ही पाहत आहेत. रिपोर्ट लवकर जाहीर करावा, त्यामुळे हत्या आत्महत्या होती हे स्पष्ट होईल', असं अनिल देशमुख म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Raosaheb Danve