रायगड, 5 जानेवारी : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुण्यातील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद (Mumbai, Thane, Navi Mumbai School closed) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही काही भागांत शाळा सुरूच आहेत. त्याच दरम्यान आता रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील एकाच शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. (Raigad school student tests positive for covid-19)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या एका शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर त्याच दरम्यान शाळेतील 2 शिक्षकांना कोरोना झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेतील एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 238 जणांची अँटीजन चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 17 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी ही माहिती दिली असून या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या सर्वांना कोणतीही लक्षणे दिसत नसून हे सर्वजण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
वाचा : मंत्रालयातील बैठक संपली, लॉकडाऊन लागणार?
कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात कठोर निर्बंधल लावावेत की लॉकडाऊन लावावे या संदर्भात चर्चा झाली.
लॉकडाऊन लावण्याचा निर्णय होणार का? यासाठी सर्वांचेच लक्ष या बैठकीकडे लागलेले होते. पण या बैठकीत लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याची चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता सध्यातरी लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत नाहीये. पण कुठेतरी कठोर निर्बंध लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृहअलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
मुंबईत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ
मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला असून मंगळवारी (4 जानेवारी) नव्या 10 हजार 860 रुग्णांची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. या रुग्णांसह मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 8 लाख 18 हजार 462 वर. मुंबईत 834 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 4491 वर पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Raigad