पुणे, 13 मार्च : निवडणुकांच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट इच्छुक असल्याची माहिती आहे. पण आता भाजपकडून त्यांच्या पत्ता कट केल्याची माहिती आहे.
भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रातील युती समन्वयाची जबाबदारी गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे गिरीश बापटांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात न उतरवण्याचा पक्षाचा विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यात शिवेसेनेकडून युतीच्या समन्वयाची जबाबदारी अर्जुन खोतकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे खोतकर यांनी दानवेंना दिलेले आव्हान मागे घेतलं असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. जालन्याची जागा भाजपला न सोडता या जागेवर अर्जुन खोतकरांनीच लोकसभा लढवावी यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. यासाठी नुकतंच शिवसैनिकांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. 'खोतकरांनी लोकसभा लढावी यासाठी आम्ही 2 वर्षांपासून कामाला लागलोय. मात्र, आता जर खोतकरांनी जालन्यातून लोकसभा लढवली नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू,' असा इशाराच शिवसैनिकांनी दिला. यावेळी रावसाहेब दानवेंविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जालन्यातील खोतकर विरूद्ध दानवे वाद सर्वश्रुत आहे. त्यात युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकरांनी दानवेंना जालन्यातून उमेदवारी देण्यावरून वारंवार नाराजी व्यक्त केली.
SPECIAL REPORT : 'सेनेच्या दबावामुळे कोल्हेंना मालिका बंद करावी लागली'