मुंबई, 28 मे : लोकसभेत भाजपने देशात स्पष्ट बहुमत मिळवलं. भाजपने लोकसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर आगामी काळात होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणनितीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाराष्ट्रात आघाडीच्या नेत्यांनी मंथन बैठक बोलावली होती.
महाआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यातील दुष्काळावर चर्चा झाली. येत्या काळात पक्षाकडून दुष्काळावर आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे. तसेच दोन्ही पक्षांनी आगामी निवडणूक आघाडी करून लढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
भाजपला मिळालेल्या यशामुळे काही आमदार असा निर्णय़ घेऊ शकतात. यामध्ये कमी मताधिक्क्याने निवडून आलेले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकतील अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली. कमीत कमी आमदार जातील याकडे लक्ष ठेवून असल्याचंही जयंत पाटील सांगितलं.
लोकसभेनंतर 2019 च्या शेवटी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपने यासाठीची रणनिती आखण्यास आतापासूनच सुरुवात केल्याचं यावरून दिसतं. भाजपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला खिंडार पाडून अनेक नेत्यांना पक्षात घेतलं होतं. तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीत वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना राज्यात शह देण्याची शक्यता आहे.
संपूर्ण देशात लोकसभेत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्रातच भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही नांदेडमधून पराभव झाला. अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या 9-10 जागांचे नुकसान केल्याचंही मान्य केलं होतं.
SPECIAL REPORT : रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.