रत्नागिरी, 28 जून : चार टप्प्याच्या कडक लॉकडाऊननंतर कोरोना व्हायरस आटोक्यात येणं अपेक्षित होतं. मात्र लॉकडॉऊनमध्ये शिथिलता आणताच कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. तर आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक भागात आता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचा अवलंब करण्यात येत असून आणखी एका जिल्ह्याने लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 7 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात येतील. तसंच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि वाहतूक बंद राहणार आहे. विशेष म्हणजे लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येईल. रात्रीच्या वेळीस नाईट कर्फ्यूदेखील असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी माहिती दिली.
सध्या कोरोनाचे अॅक्टिव्ह 117 रुग्ण असून ती संख्या शुन्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरासह दापोलीतील दोन गावात कोरोना रुग्णांनाची कोणतीही हिस्ट्री नसल्याने जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड होण्याची शक्यता आहे. त्याबाबत चौकशी सुरू आहे. परंतु सावधानता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांत पुन्हा लॉकडाऊन
विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात HOT SPOT आहे त्या भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.