मुंबई, ता.13 नोव्हेंबर : राज्यात अवैध दारू विक्री बोकाळत असताना एक-दोन जिल्यातच दारूबंदी का असा सवाल करत राज्यातील्या काही जिल्ह्यांमधील दारूबंदी हटवण्याची मागणी मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेनं केली. राज्यात सध्या वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. दारूबंदी असली तरी त्याची अंमलबजावी योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळं अवैध दारूविक्री वाढलीय, अनेक गैरप्रकार होतात ते टाळण्यासाठी दारूबंदी हटवली पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
वर्धा हा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर चंद्रपूरात दारूबंदीसाठी महिलांचं मोठं आंदोलन झालं होतं. त्यामुळं सरकारनं या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट झालाय. खुद्द राज्यातल्या ज्येष्ठ मंत्र्यांनीच अशी मागणी केल्यानं त्याला महत्व प्राप्त झांलंय.
विषारी दारूमुळं अनेकांचा जीवही जातोय. असं असेल तर दारूबंदी हटवा अशी शिवसेनेची भूमिका आहे. दारूबंदी हटवली तर विषारी दारूमुळे जाणारे जीवतरी वाचतील अशी त्यामागची भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दारूबंदीमुळं भ्रष्टाचारातही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
गुन्हेगारी वाढते. पोलिसही हप्ते घेऊन अवैध दारूविक्रीकडे डोळेझाक करतात त्यामुळं ही बंदीच हटवण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानं सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र अनेक स्वयंसेवी संघटनांचा अशी बंदी हटवण्याला तीव्र विरोध आहे. दारूने अनेक संसार उद्धवस्त झालेत.
स्त्रियांना त्याची मोठी झळ सोसावी लागते असा युक्तिवाद या संघटना कायम करत असतात त्यामुळं सरकार या मागणीचा कसा विचार करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
VIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Liquor ban, Maharashtra government, Shiv sena, Subhash desai, Wardha