सांगली, 11 जुलै : आषाढी वारी करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत. तासगाव (Sangali News) तालुक्यातील मनेराजुरी या ठिकाणी हा अपघात (Road Accident) घडला. जखमींना तातडीने सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील भागाईवाडी व परिसरातील 60 वारकरी हे आषाढीवारी निमित्ताने पंढरपूरला गेले होते. आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला. एका टेम्पोमधून हे सर्व वारकरी पंढरपूर येथून सकाळी निघाले. दरम्यान दुपारी तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील पावर वस्तीजवळ पोहचले असता वळण घेताना टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यानंतर टेम्पो हा रस्त्याकडेला पलटी झाला.
टेम्पोमध्ये बसलेले वारकरी हे एकमेकांच्या अंगावर पडले. त्याचबरोबर काही वारकरी हे गाडीतून बाहेर फेकले गेले. त्यामुळे दहा ते बारा वारकरी यामध्ये जखमी झाले आहेत. यामध्ये वयस्कर महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. घटनास्थळी तातडीने ग्रामस्थांनी धाव घेतली होती. त्यानंतर रुग्णवाहिका आणि इतर वाहनातून जखमी वारकऱ्यांना सांगली, मिरज आणि तासगाव इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत कवठेमहांकाळ तालुक्यातल्या केरेवाडी या ठिकाणी जीप गाडी घसरल्याने अपघात घडला होता. ज्यामध्ये 17 वारकरी हे गंभीर जखमी झाले होते. त्यापाठोपाठ आणखी एक वारकऱ्यांच्या दिंडीला परतत असताना अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या दोन्ही अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची आतापर्यंत जीवित हानी झालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashadhi Ekadashi, Road accident, Sangali