ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 12 मे : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातलं सरकार वाचलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरातूनही अनेक जण यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिंदेच्या ऐवजी कोल्हापुरात भाजपला मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विनय कोरे हे याचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत काहीशी अस्वस्थता आहे.
शिंदे फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी देव पाण्यात घातले आहेत. कोल्हापुरातून शिंदेच्या बंडात सामील झालेले प्रकाश अबीटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या निमित्ताने अपेक्षा पुन्हा जागृत झाल्या आहेत. यड्रावकर हे राज्यमंत्री असतानाच शिंदे गटात सामील झाले होते, त्यामुळे त्यांच्याकडून मंत्री पदावर दावा केला जात आहे.
तर शिवसेनेचे जिल्ह्यात एकमेव आमदार असलेले प्रकाश अबीटकर यांनी सेना वाढीसाठी आपल्यालाच मंत्रिपद मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तर भाजपच्या गोटातून माजी मंत्री विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांनी फिल्डिंग लावली आहे. विनय कोरे यांची फडणवीस यांच्याशी वाढती जवळीक असल्याने आणि सहकारात कोरेंचा असलेला दबदबा पाहता ते मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, तर आवडेंनीही तितकीच ताकद लावायला सुरूवात केली आहे.
कोल्हापुरात शिंदे गटाचा राजेश क्षीरसागर सोडले तर तसा ताकदवान नेता कोणी नाही. त्यामुळे शिंदे इथे मंत्रिपद देऊन शिवसेना वाढीचे काम करणार की, मित्रपक्ष म्हणून भाजपला मंत्रिपद सोडणार हे आता पाहावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena