मुंबई, 7 जुलै : कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसचे 12 आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकात लवकरच सत्ताबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस–जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राजीनामा दिलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी पुन्हा घरवापसी करू नये, यासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. या सगळ्याची जबाबदारी भाजपच्या नेतृत्वाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्याची माहिती आहे.
दरम्यान, भाजपच्या या हालचालींमुळे कर्नाटकमधील विद्यमान सरकारचं भवितव्य अधांतरी आहे. कारण, शनिवारी 14 आमदारांनी आपले राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार टिकणार की जाणार? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 11 आणि जेडीएसच्या 3 आमदारांचा समावेश आहे.
काँग्रेस–जेडीएस सरकारचं भवितव्य एका नेत्याच्या हातात आहे असून तो नेता म्हणजे रामलिंग रेड्डी. रामलिंग रेड्डी हे बंडखोर आमदारांचं नेतृत्व करत आहेत. रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आल्यास काँग्रेस – जेडीएस सरकारला कोणताही धोका नसणार आहे. त्यामुळे काँग्रेसनं आपली संपूर्ण ताकद आता रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यावर केंद्रीत केली आहे.
सरकार टिकवण्यासाठी किमान 3 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकीय घडामोडी अत्यंत रंजक अशा वळणार आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाळ बंगळूरूमध्ये दाखल झाले आहेत.
भाजपला सत्ता स्थापनेची संधी
कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेची हुकलेली संधी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसकडे 78, जेडीएस 37, बसपा 1, अपक्ष 2, भाजप 105 आणि अन्य 1 अशी आकडेवारी आहे. दरम्यान, 11 आमदारांचा राजीनामा स्वीकार केल्यास सदस्यसंख्या 210 होईल. त्यामुळे बहुमताचा आकडा हा 113 ऐवजी 106 होईल. काँग्रेस – जेडीएसकडे 104 आमदार आहेत. त्यांना बहुमतासाठी 2 जागा कमी पडतील. तर, भाजपाकडे 105 जागा असल्यानं त्यांना केवळ 1 आमदाराची गरज आहे. त्यामुळे भाजपला सरकार स्थापनेची संधी या ठिकाणी सर्वाधिक आहे. पण, पुढील 3 दिवस हे कर्नाटकाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
VIDEO: नाणेघाटातील निसर्गाचं सौंदर्य अद्भूत