रत्नागिरी, 18 जुलै : महाविकास आघाडीचे मंत्री आणि आमदारांच्या पाठी ईडीचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर (Jarandeshwar Sugar Factory )कारखान्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Ratnagiri District Central Co-operative Bank) ईडीने नोटीस बजावली होती. पण, हाती मात्र काहीच लागले नाही.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीच पत्र आलं होतं. याबाबत बँकेकडून काही गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. जरंडेश्वर शुगर मिल्स कंपनीला केलेला कर्जपुरवठा नियमांचे पालन करुनच करण्यात आला असून , 8 कोटी 75 लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आलं आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.
तसंच, जून महिन्यात दिलेल्या कर्जावरील व्याजाचा पहिला हप्ता जुलै महिन्यात बँकेकडे जमाही झाला आहे. यासंदर्भात मागवण्यात आलेली सर्व माहिती ईडीकडे सादर केली आहे, अशी माहितीही डॉ. तानाजीराव चोरगे यांनी यांनी दिली आहे.
'बँकेने दिलेले कर्ज सुरक्षित आहे. जरंडेश्वर सहकारी शुगर मिल्स प्रा. लिमिटेड कंपनीने जरंडेश्वर साखर कारखाना चालवण्यास घेतला आहे, असंही चोरगे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, ईडीने 1 जुलै रोजी साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला. कारखान्यावर कारवाई केल्यानंतर आता हा कारखाना खरेदीसाठी ज्या बँकांनी कर्ज दिलं होतं त्या बँकांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Pune district central cooperative bank) आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Satara district central cooperative bank) या दोन्ही बँकांना नोटीस बजावली आहे. कोरेगावच्या जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार आणि महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता. शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. मात्र, हा लिलाव हेतूपरस्कर असल्याचा आरोपही करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटींहून कमी होती त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा साखर कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने ही कारवाई केली आहे.
याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED