जळगाव, 09 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे झाडावरील बगळ्यांच्या त्रासामुळे तहसील कार्यालयातील बगळ्यांचा निवारा असलेले झाड तोडण्यात आले. दरम्यान यामुळे शेकडो बगळ्यांच्या पिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Jalgaon Chopada Tehsil) या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. झाडावरील बगळ्यांची विष्ठा अंगावर पडत असल्याने काही अज्ञातांनी बगळ्यांची वस्ती असलेले हे पुरातन झाड तोडून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
विष्ठेचा वास येतो या कारणावरून चोपडा तहसील व शहर पोलिस स्थानकाच्या आवारात असलेले एक चिंचेचे मोठं झाड मागच्या दोन दिवसांपूर्वी तोडण्यात आले. या झाडावर घरट्यात असलेले १२० पानकावळे, गायबगळे, छोटा बगळा, ढोकरी (वंचक) यांचा मृत्यू झाला. ५५ अंडी फुटली. तर पक्षिमित्रांनी धाव घेऊन सुमारे २१० पक्ष्यांना जीवदान दिले.पंधरा दिवसांपूर्वी या झाडाची एक फांदी कुणीतरी तोडली. त्या दिवशी १०० पेक्षा जास्त पक्षी निराधार झाले होते.
हे ही वाचा : Cabinet Expansion :अब्दुल सत्तार, संजय राठोड होणार मंत्री? एकूण 18 जणांचा शपथविधी, संपूर्ण यादी
पक्षीमित्र कुशल अग्रवाल यांनी तहसील कार्यालयात येऊन झाड, फांदी तोडू नका अशी विनंती केली होती. दरम्यान, रविवारी सुटीचा दिवस निवडून हे झाड तोडण्यात आले. त्यामुळे पक्ष्यांची हानी झाली. या चिंचेच्या जुन्या वृक्षावर गायबगळे, पानकावळे यांचा अनेक वर्षांपासून अधिवास होता. परिसरात पक्ष्यांची विष्ठा पडते, घाण वास येतो या कारणाने वृक्षतोड होत असल्याची माहिती काही पर्यावरणस्नेही नागरिकांनी वन्यजीव संरक्षण संस्थेला दिली.
संस्थेचे कुशल अग्रवाल, पक्षी अभ्यासक हेमराज पाटील हे घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत चिंचेचे झाड तोडण्यात आले होते. वनक्षेत्रपाल समाधान सोनवणे, वनकर्मचारी नोकेश बारेला, विपुल पाटील यांच्या पथकाने पंचनामा केला. पक्षिमित्र, वनकर्मचाऱ्यांनी जखमी पक्षी ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवले. वृक्षतोड करण्याचे आदेश देणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हे ही वाचा : शेतकरी भर पावसात उभे होते पण मुख्यमंत्री आलेच नाही, शिंदेंनी लगेच केला फोन आणि...
यामुळे अनेक पिलांचा मृत्यू झाला असून अनेक बगळ्यांचे पिले जायबंदी झाले आहेत. तर काही पिलांना सुखरूप वाचवण्यात वन्यजीव संस्थेच्या सदस्यांना यश आले आहे . मात्र अनेक बगळ्यांच्या पिलांचा या घटनेत मृत्यू झाल्याने पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. याबाबत कोणतीही परवानगी न घेत हे झाड तोडल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. बगळ्यांच्या पिलांना आधार मिळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalgaon, Tree, Tree plantation