इम्तियाज अहमद, प्रतिनिधी
जळगाव, 1 मे: महाराष्ट्रात कोरोना संकटाच्या काळात राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काही दिवसांपूर्वी टीका करत म्हटलं होतं की, राज्य सरकारला कोरोनाची परिस्थिती (Corona pandemic situation) हाताळण्यात अपयश आलं आहे. या टीकेला आता महाविकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
...तो पर्यंत लसीकरण पूर्ण होऊच शकत नाही
गुलाबराव पाटील म्हणाले, कालच मुख्यमंत्र्यांनी लसीबाबत घोषणा करताना सांगितले की आम्ही राज्यासाठी 12 कोटी डोस केंद्राकडून घेण्यासाठी तयार आहोत. त्याचा धनादेश देखील तात्काळ देऊ. राज्य सरकार लस घ्यायला तयार आहे, लस देण्याचा अधिकार कोणाला आहे? हे सर्वांना माहिती आहे. आगामी दोन ते अडीच महिन्यांत संपूर्ण राज्याचे लसीकरण पूर्ण होईल एवढी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. जोपर्यंत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत देव जरी आले तरी लसीकरण होऊ शकत नाही.
भारत बायोटेकची लस स्वदेशी असून इतकी महाग का, नेमका नफा कुणाला?, रोहित पवारांचा थेट सवाल
भर चौकात सत्कार करेल
गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अमित शहा यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले होते. यामुळे त्यांचा जर केंद्रात प्रभाव पडला असेल तर गिरीश महाजन यांनी केंद्राकडून जळगाव जिल्हा आणि राज्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा. असे झाले तर त्यांचा भर चौकात जाहीर सत्कार करेल अशी ग्वाही मी देतो असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना चिमटा काढला आहे.
बंगालमध्ये ममतांचाच विजय होईल
गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात विविध माध्यमांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यावरुन लढत अटीतटीची असल्याचे दिसून येत आहे. पण शेवटी जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडे असल्याने सत्ता ममता बॅनर्जी यांचीच येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Girish mahajan, Gulabrao patil