असिफ मुरसल, सांगली 17 जुलै : मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडलाय. तर संपन्न समजल्या जाणाऱ्या सांगलीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 100 कोटींनी फसवणूक झाल्याचं उघड झालंय. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून द्राक्ष घेतली मात्र वर्षभरानंतरही त्यांचे पैसे न दिल्याने आता काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय.
द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रबोधनही केलं होतं. मात्र तरीही तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील जवळपास बाराशेहून अधिक द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची व्यापार्यांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाल्याचं उघड झालंय. उधारीवर द्राक्षे घेऊन गेलेल्या 400 पेक्षा जास्त व्यापार्यांनी दिलेले शेकडो चेक बाऊन्स झाले आहेत. काही व्यापार्यांचे मोबाईल गेल्या एक महिन्यापासून नॉट रिचेबल आहेत. मोबाईल ऑन असणारे व्यापारी शेतकर्यांचे फोन घेत नाहीत. स्थानिक एजंटांनी हात वर केल्याने द्राक्षांचे पैसे मिळणार की नाही या काळजीने द्राक्षबागायतदार हवालदील झाला आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का, संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार?
सांगली जिल्ह्यातील तब्बल 85 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. यापैकी 10 टक्के क्षेत्रावरील द्राक्षांची निर्यात होते. 20 टक्के क्षेत्रावरील द्राक्षांपासून बेदाणा तयार होतो. 70 टक्के क्षेत्रावरील द्राक्षे देशाच्या विविध भागातील व्यापारी खरेदी करत असतात. शेतकर्यांची थेट ओळख नसल्याने स्थानिक एजंटांना हाताशी धरुनच सर्व व्यापारी द्राक्षे उधारीवर खरेदी करतात. दरवर्षी एक हजाराच्या आसपास व्यापारी जिल्ह्यात येतात. एखाद्या - दुसर्या शेतकर्याची द्राक्षे रोखीने खरेदी केली जातात. शेतकर्यांचा विश्वास बसला की नंतर केवळ 500 ते 1000 रुपये अनामत रक्कम देऊन लाखो रुपयांची द्राक्षे व्यापारी उधारीवरच घेऊन जात असतात.
पंधरा दिवस ते एक महिना या कालावधीत शेतकर्यांना पैसे दिले जातात. दरम्यानच्या काळात विश्वास अबाधीत रहावा यासाठी व्यापार्यांनी कोरे किंवा लाखो रुपयांचा आकडा लिहलेले शेकडो चेक शेतकर्यांना दिले आहेत. आतापर्यत परप्रांतीय व्यापारी येऊन फसवणूक करत होते पण आता स्थानिक व्यापारी देखील फसवणूक करू लागल्याने द्राक्ष शेतकऱ्यांची कंबरडचं मोडलंय. यामुळे आता ऑक्टोंबर छाटणी घेण्याची वेळ आली तरी मागील हंगमाचे पैसे न मिळाल्याने पुढील हंगाम घेता येईल काय याची शाश्वती शेतकऱ्यांना राहिली नाही.
द्राक्ष काढणी हंगाम सुरू होता तोपर्यंत सर्व व्यापार्यांनी शेतकर्यांना थोडी थोडी रक्कम देऊन बोळवण केली. हंगाम समाप्त झाल्यावर व्यापार्यांनी पळ काढला आहे. पैसे अडकलेले सर्व शेतकरी व्यापार्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून पैसे मागत आहेत. व्यापारी मात्र शेतकर्यांना जुमानत नाहीत. या प्रकाराला वैतागलेल्या शेतकर्यांनी व्यापार्यांनी दिलेले चेक बँकेत भरले आहेत. बहूतांशी चेक खात्यावर पैसे नसल्याने बाऊन्स होऊन परत आले आहेत. शेतकरी एजंटाकडे खेटे घालत आहेत. परंतु त्यांनीही हात वर केले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून त्याची मालमत्ता जप्त करण्याती मागणी केलीय.