मनमाड, 15 जानेवारी : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (Gram Panchayat Election 2021) बिघाड झाल्याचे समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि कोल्हापूरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे.
नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील प्रभाग क्रमांक 3 चे ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदान प्रकिया ठप्प झाली आहे. आता पर्यंत एकही मतदाराला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीत देखील असाच प्रकार घडला आहे. इथंही ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले.
तर, मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सुरुवात झाली. पण ईव्हीएम मशीनमधून उमेदवारांचे नावच गायब झाल्याचे दिसून आले आहे. वॉर्ड नंबर 2 मधील उमेदवाराचे नाव गायब ईव्हीएम मशीनमधून गायब झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने वॉर्ड 2 मधील मतदान प्रक्रिया थांबली. घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सुरू आहे.
तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद पडले आहे. प्रभाग क्रमांक 2 चे ईव्हीम मशीन बंद झाले आहे. मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने प्रकार लक्षात आला.
दरम्यान, राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हीच जास्त जागा जिंकल्या, असा दावा केला जातो. तसेच राजकीय पाया भक्कम करण्यासाठी सर्वच राजकीय नेते आपापल्या भागांमधील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. खासदारकी आणि आमदारकीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात असणे राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असते. त्यामुळे या वेळीही सर्वच नेत्यांनी आपापल्या भागांमधील निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, कोल्हापूर, नाशिक