मुंबई, 19 सप्टेंबर : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा एकदा देशात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामिबियाहून 8 चित्ते भारतात आले. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहे. यानंतर आता चित्ता मुंबईतही यावा अशी मागणी होत आहे.
तीन वेळा निविदा रद्द -
मुंबई महापालिकेने 2018 मध्ये राणीच्या बागेत परदेशातून वन्यजीव आणण्याची योजना आखली होती. त्यात चित्त्यासह पांढरा सिंह, चिम्पांझी, लेमूर, लेझर फ्लेमिंगो, हिप्पो, ईमू, जग्वार आदी प्राण्यांचा समावेश आहे. त्या संदर्भातील निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, त्या निविदा तीन वेळा विविध कारणाने रद्द झाल्या आहेत. आता त्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत मुंबईकरांना राणीच्या बागेत नव्या वन्यजीवांचे वैविध्य अनुभवता येईल.
मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) हे चित्ते येतील. या प्रस्तावित चित्त्यांचे आगमन होण्यासाठी किमान अडीच वर्षे इतका कालावधी लागण्याची शक्यता आहे. केवळ निविदा रद्द झाल्याने आजवर चित्ता मुंबईत येऊ शकलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. राणीच्या बागेत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत याठिकाणी हजेरी लावत असतात.
हेही वाचा - देशभरात ढिगभर पार्क असताना नामिबियन चित्ता ठेवण्यासाठी एमपीमधील कुनो नॅशनल पार्कचं का निवडलं? कारण आहे खास
सध्या या बागेत वाघ, बिबळ्या, हत्ती, कोल्हे आदींसह विविध प्रकारचे वन्यजीव, पक्ष्यांचा समावेश आहे. राणी बागेत औरंगाबाद येथील प्राणीसंग्रहालयातून दोन वर्षांपूर्वी शक्ती आणि करिष्मा ही वाघांची जोडी दाखल झाली होती. त्यामुळे साधारण 13 वर्षांनंतर पर्यटकांना राणी बागेत वाघ पाहता आले. या जोडीला 14 नोव्हेंबर, 2021मध्ये ‘वीरा’ या बछड्यास जन्म दिला. त्यामुळे आता चित्ता आणि सिंह येण्याची वाट पर्यटक पाहत आहेत. साधारण अडीच वर्षात पर्यटकांना चित्ता पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.