चिपळूण, 7 सप्टेंबर: गणेशोत्सवाचे वेध लागलेले असले (Ganesh Chaturthi 2021)तरी अद्याप Coronavirus चा धोका कमी झालेला नाही. राज्य शासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कोविड निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडच्या काळात होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.
या काळात जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमानी मंडळींचा खोळंबा होवू नये यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. पण किमान दोन पैकी एका अटीची पूर्तता केली तरच प्रवेश मिळणार आहे.
18 वर्षाखालील युवक, बालक यासह दोन लस घेणाऱ्या व्यक्ती आणि प्रवासापूर्वी 72 तास आधी आरसीपीटीआर चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांनाच थेट प्रवेश आहे.
हे दोन्ही केलेलं नसेल तर मात्र खोळंबा होऊ शकतो. अशा प्रवाशांचे पत्ते नोंदवून घेण्याची स्वतंत्र व्यवस्था कऱण्यात आली आहे. रेल्वेस्थानक तसंच जिल्ह्यात येताना अँटिजेन चाचणी अनिवार्य आहे. त्यासाठी सर्वांसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. या ठिकाणी तपासणी न करणाऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये तपासणी करता येणार आहे. तपासणीत पॉझिटिव्ह असल्यास संस्थात्मक विलगीकरणाची सोय आहे.
अशी आहे सज्जता
-जिल्ह्यात 114 सार्वजनिक गणपती व 1 लाख 56 हजार घरगुती गणपतींची नोंद झाली आहे.
-जिल्ह्यात पूर्ण गणेशोत्सव काळात पाच दिवस मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहतूक बंद असेल.
-गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या सर्व वाहनांना पथकरात (टोलमाफी) माफी देण्याचा शासन निर्णय झाला आहे.
-या सर्व काळात येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी 23 ठिकाणी मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली आहे.
-एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत देणे शक्य होईल अशी यंत्रणा या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी अशा मंडपांची संख्या केवळ 14 होती.
सर्व महामार्गावरील धोकादायक वळणांवर सूचना फलक लावण्यासह झाडांची सफाई करुन दृश्यमानता जादा राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. सोबतच महामार्गावर परिवहन विभागाची पथकेही उपस्थित आहेत.
जगातील सर्वात स्वस्त JioPhone Next ची विक्री होतेय सुरू, केवळ 500 रुपयात करा बुक
-गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दलातर्फे 250 बैठका आत्तापर्यंत घेण्यात आल्या आहेत. यामध्ये 17 मंडळस्तर बैठका, 18 शांतता कमिटीच्या बैठका, मोहल्ला कमिटीच्या 22 बैठका, पोलीस पाटील स्तरावरील 19 बैठका, समन्वयासाठी 6 बैठका आणि पोलीस अधिकारी यांनी मोठ्या गावात घेतलेल्या 172 बैठका यांचा समावेश आहे आणि गणेशोत्सव कालावधीतही बैठका जारी राहणार आहेत.
-पोलीस दलाने ग्राम दत्तक योजनेत 50 गावे घेतली आहेत या सर्व गावांमध्ये गणेशोत्सव काळात कोविड नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
-गणेश विसर्जन मिरवणूकांवर बंदी आहे याचे पालन होईल यासोबतच काही गैरप्रकार रोखणे यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
-विसर्जन कालावधीत अनेकदा बुडण्याच्या घटना घडतात या प्रकारच्या घटनात कुणाचा मृत्यू होवू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी काही किनाऱ्यांवर जीवरक्षकांची मदतही घेण्यात येणार आहे.
-आपणही नागरिक म्हणून प्रशासनास सहकार्य करावे आणि कोव्हीड नियमांचे पालन करुन सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.