अमरावती, 15 जून- शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर तलाव झाला नाही. ती जमीन परत मिळावी, यासाठी लढा देणारे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी अनिल चौधरी यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर तलाव झाला नाही. ती जमीन परत मिळावी, यासाठी लढा देणारे शेतकरी अनिल चौधरी यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात विष प्राशन केले होते. तसेच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 20 वर्षापूर्वी अनिल चौधरी यांची 10 एकर शेत जमीन शासनाने तालावसाठी अधिग्रहित केली होते. मात्र 10 एकरापैकी 7 एकर जमिनीवरच शासनाने तलावाची निर्मिती केली होती. त्यामुळे उर्वरित 3 एकर जमीन परत मिळावी यासाठी अनिल चौधरी यांची न्यायालयीन लढाई सुरू होती.
समृद्धीसाठी मुरूम नेण्यास विरोध
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना 15 मे रोजी अमरावती जिल्हा परिषदेने अनिल चौधरी यांच्या उर्वरित 3 एकर शेतातून समृद्धी मार्गासाठी मुरूम खोदून नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर 'माझ्या शेतीचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे माझ्या शेतातून मुरूम नेऊ नये', असे निवेदन अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर केले होते.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊनही अनिल चौधरी यांच्या शेतातून मुरूम काढणे सुरू होते. त्यामुळे चौधरी यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विष प्राशन करून अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या जवळची रॉकेलची कॅन ओढून घेतली.
या घटनेनंतर अनिल चौधरी यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अनिल चौधरी यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उलटली याप्रकरणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांनी केली, यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पेट्रोल पंपावर बर्निंग बाईकचा थरार, थोडक्यात अनर्थ टळला