मुंबई, 23 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मागच्या दोन दिवसांपासून पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील सरकार अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी वर्षा बंगल्यावरून निघत मातोश्रीवर (matoshree) जाण्याचे ठरवले यानंतर बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या हॉटेलची सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे. याचबरोबर त्यांनी फेसबुकवर भावनीक आवाहन केल्यानंतर काही बंडखोर आमदार फुटतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीमध्ये सामनातून (saamana editorial) बंडखोर आमदार आणि भाजपवर (bjp) जोरदार टीका करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत.
राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला आणि नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये, अशी खरमरीत टीका सामन्यातून करण्यात आली आहे.
नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले आणि त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील 'सागर' बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल.
हे ही वाचा : राज्यातील राजकीय पेच सुप्रीम कोर्टात; पक्षांतर करणाऱ्या सर्व आमदारांवर कारवाईची मागणी
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले आणि आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत, असे लेखात सांगण्यात आले आहे.
राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील 'जादा' विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे 'माजी' होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा सल्लाही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Facebook, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)