मुंबई, 15 जुलै : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निवडणुकांनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. पूर आणि आपात्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था तसेच, सदर परस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, 250 ककवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च/ उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी सांस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असं सहकार विभागाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या निवडणुका शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करुन निवडणुका घेण्याबाबत कार्यवाही करावी, असंदेखील सहकार विभागाने म्हटलं आहे.
"राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे, भारतीय हवामान खात्याकडून (IMD) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यात पूर परिस्थितीमुळे 89 व्यक्ती आणि 181 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेली 249 गावे तसेच एकंदरीत 1368 घरांची पडझड झालेली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणनू राज्यातील अनेक जिल्यांत एन.डी.आर.एफ.ची पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व धरणे पूर्णपणे भरलेली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्था आणि जनजीवनावर मोठ्या प्रमोणात होण्याची शक्यता आहे", असंदेखील सहकार विभागाने आदेशात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Maharashtra News