मुक्ताईनगर, 22 ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपचा रामराम ठोकला आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रवादीत आपण प्रवेश करणार होतो. एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर, इतक्या वर्षांनंतर आपण भाजप का सोडताय असा सवाल केला असता खडसेंनी मोठा खुलासा केला आहे.
'भाजप पक्ष सोडण्याचा मी आताच निर्णय का घेतला असे विचारले जात आहे. पण, पक्ष सोडण्याचा याआधीही निर्णय घेतला होता. मागील निवडणुकीच्या वेळी मला भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळीच मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार होतो. माझ्याकडे एबी फॉर्म सुद्धा तयार होता. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी वेळोवेळी निरोप दिला होता. पण, त्यावेळी निर्णय घेता आला नाही, असंही खडसेंनी सांगितले.
'देवेंद्र फडणवीस हे जे बोलतील तोच निर्णय अखेरचा मानला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. भाजपमध्ये मी एकटाच नाही अनेक नेते नाराज आहे. चंद्रकांत पाटील यांना सुद्धा आपला निर्णय रेटून लावता येत नाही. पक्षात सामूहिक नेतृत्व राहिले नाही', अशी टीकाही खडसेंनी केली.
'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मी अमित शहा यांना दिल्लीत भेटलो होतो, त्यांच्या कानी हे सर्व काही ठाकलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्याकडेही माहिती पुरवली होती. गेल्या चार वर्षांमध्ये सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन तक्रार केली होती. नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली होती. नितीन गडकरी यांची अनेक वेळा भेट घेतली होती, पण काही ही झाले नाही', असंही खडसे यांनी सांगितले.
तसंच, मी राष्ट्रवादी जाणार अशी चर्चा सुरू असताना कोणत्याही भाजपच्या नेत्याने माझ्याशी संवाद साधला नाही. कुणीही मला फोन केला नाही. फक्त चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता, असंही खडसेंनी सांगितले.