जालना, 26 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे तर दुसरीकडे मंत्री आणि नेत्यांमागे ईडीचा (ed) ससेमिरा कायम आहे. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेनेचे (shivsena) नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. ईडीचे पथक घरी पोहोचल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केला होता. यानंतर आज जालन्यात ईडीचे पथक दाखल झालं आहे. या पथकाने आज रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी जालना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली आहे.
IND vs NZ : दुसरा दिवस न्यूझीलंडच्या नावावर, सलामीवीरांची अभेद्य भागीदारी
त्यानंतर जुन्या मोंढ्यातील अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्स मधील कार्यालयात देखील ईडीच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी चौकशी केल्यानंतर हे पथक आता जालन्यातील अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी पोहचल असून अर्जुन खोतकर यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
किरीट सोमय्यांनी काय केला होता आरोप
"राज्य सरकारची 100 एकर जमीन बळकवण्याचा अर्जुन खोतकर यांचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांनी जी जमीन कारखान्यासाठी दिली आहे त्याची आज मार्केट व्हॅल्यू 1 हजार कोटींच्या आसपास आहे. साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. कामगाराचे पैसेही दिले नाही. पण त्या जागेवर बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉम्पलेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारी मी ईडीपासून राज्य मंत्रालयापर्यंत दिल्या", असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. तसंच खोतकरांनी रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला, असाही आरोप सोमय्यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.