जालना, 11 जानेवारी : केरळसह भारतातील इतर काही राज्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्ल्यू या रोगाचा शिरकाव झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पक्षांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे आता मांसाहार करणाऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण असून चिकन खावं की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. याबाबत आता थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच भाष्य केलं आहे.
परभणीसह राज्यातील काही भागात कोंबड्या, कावळे या पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याने खवैय्यांमध्ये चिकन खाण्याबद्दल भीती निर्माण झाली आहे. ज्यामुळे चिकन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चिकन आणि बर्डफ्लू संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खवैय्यांना एक दिलासादायक बातमी दिली आहे.
पक्षाच्या चोचांच्या माध्यमातून लाळेद्वारे बर्ड फ्ल्यू विषाणूचा प्रसार होत असतो. बर्ड फ्ल्यूचा प्रसार माणसात होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. चिकन खाल्ल्याने बर्ड फ्लू पसरत नाही. चुकीच्या पध्दतीने न शिजवता व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्याने या रोगाचा धोका टळतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
'परभणीत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून अशा प्रकारची तपासणी गरजेची आहे. आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने हातात हात घालून काम केलं पाहिजे,' असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bird flu, Rajesh tope