स्वप्निल घाग, प्रतिनिधी
चिपळूण, 01 एप्रिल : भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी रेकी करत असताना भुस्खलन झाल्यामुळे महाराष्ट्रातील चिपळूण येथील जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. सुभेदार अजय ढगळे यांचा बर्फ आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ढगळे यांचे पार्थिव सोमवारी चिपळूण मधील मुळगावी चोरवणे आणण्यात येणार आहे.
भारत-चीन सीमेवर रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. यावेळी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र आणि माजी सैनिक मुलांचे वसतीगृह चिपळुणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते.
त्याचवेळी सततच्या पावसामुळे बर्फवृष्टीमुळे 24 मार्च रोजी सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. त्यात सुभेदार अजय ढगळे आणि त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले. ते मातीच्या आणि बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
याची माहिती मिळताच भारतीय सैन्य दलाने जवानांचे मृतदेह शोधण्याचे काम हाती घेतले. मागील सहा दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. बर्फवृष्टी सुरू असताना ही शोधमोहीम सुरू होती. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना अडथळा येत होता. पण, जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून चिखल आणि मोठाले दगड बाजूला केले. अखेर सहाव्या दिवशी शहीद सुभेदार अजय ढगळे आणि इतर चार जवानांचे मृतदेह शोधून काढलं. शहीद अजय ढगळे हे कारगिल युद्धाच्या वेळी टायगर हिल जिंकणाऱ्या टीममध्ये होते.
अजय ढगले यांचं पार्थिव आज संध्याकाळी तवंगला आणण्यात येणार आहे. पण हवामान खराब असल्यामुळे रस्त्याच्या मार्गाने रविवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव गुवाहाटीला आणण्यात येणार आहे. गुवाहाटीला आणल्यानंतर पुढे विमानाने पार्थिव हे पुण्यात आणले जाईल. त्यानंतर त्यांच्या मुळ गावी आणले जाणार आहे. सोमवारी त्यांच्यावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.