रायगड, 17 मे: तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) महाराष्ट्राच्या समुद्रीकिनाऱ्यावर परिणाम दिसायला लागले आहे. रायगड (Raigad) जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली असून भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात पहाटे तीन वाजल्यापासूनच जिल्ह्यात या वादळाचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका भाजीविक्रेती महिला जखमी झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 181 घरांना किरकोळ बाधा झाली आहे. या वादळात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7,866 नागरिकांना सुस्थळी प्रशासनाने हलविले आहे. तसेच जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मार्गावर 12 मोठी झाडे पडली होती जी आता मार्गावरुन हलवून रस्ते मोकळे करण्यात आले. श्रीवर्धन व मुरुड तालुक्यातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. तर रोहा, महाड व अलिबाग येथे काही ठिकाणी विज प्रवाह खंडीत करण्यात आला आहे. महाड व पोलादपूर येथे अनेक ठिकाणी पडलेले पोल उभे करुन विज प्रवाह सुरू करण्यात यश आले आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले आहे.
अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158 या ठिकाणातील एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.