अहमदनगर, 02 एप्रिल : कोरोना व्हायरसने महाराष्ट्राला विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी डॉक्टरांसह पोलीस आणि महापालिका प्रशासन जीवाची बाजी लावत आहे. परंतु, अहमदनगरमध्ये फवारणी करण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आला.
शहरातील नागापूर इथे जंतुनाशक फवारणी पथकावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. यात आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नगरसेविका रिटा भाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य निलेश भाकरे आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी हा हल्ला केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
हेही वाचा -धक्कादायक! पत्नीचा त्रास इंजिनिअर तरुणाला असह्य, क्षणात संपवलं आयुष्य
या प्रकरणी पोलिसांनी सदर व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या जंतुनाशक फवारणी पथकाने आपले काम बंद केले आहे.
'आम्ही सांगू त्या पद्धतीनेच फवारणी करा' असा आग्रह नगरसेविकेच्या नातेवाईकांचा होता. मात्र, कर्मचारी नियमानुसार फवारणी करत असल्याने हा हल्ला झाल्याचे समजते.
लॉकडाउन नंतर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने यापुढे पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय कर्मचारी काम करणार नाहीत असा पवित्रा कामगार संघटनेने आता घेतला आहे.
हेही वाचा -अरे देवा, कोरोनाची पोलिसाच्या संसारात एंट्री,अवस्था वाचून डोळ्यात येईल पाणी
कर्मचाऱ्यांवर याआधीही असे हल्ले झाले आहे. एवढंच नाहीतर कर्मचाऱ्यांना पुरेशा सुरक्षा सुविधा उपलब्ध नाहीत, याची तक्रार मनपा आयुक्तांकडे केली, पण त्याची दखल घेतली जात नसल्याचा कामगार संघटनेचा आरोप आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना पोलीस-प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असं आवाहन कामगार नेते अनंत लोखंडे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.