मुंबई, 2 एप्रिल : राज्यात कोरोनाव्हायरचं थैमान अजूनही अटोक्यात आलेलं नाही. आज पुन्हा एकदा दिवसभरात 88 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. दिवसभरात राज्यात 4 मृत्यूही नोंदले गेले. यातले 3 जण मुंबईत तर एक महिला पुण्यात मृत्युमुखी पडली. आता राज्यात कोरोनाबळींची संख्या 20 झाली आहे. ही देशातली सर्वांत जास्त संख्या आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 42 रुग्णांना बरं वाटल्यामुळे घरी सोडलं आहे. नवीन 88 रुग्णांसह एकूण कोरोनाग्रस्त 423 झाले आहेत. त्यातील 54 रुग्ण मुंबईत असून 9 जण अहमदनगरचे, 11 पुण्यातले आहेत. याशिवाय 9 जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. म्हणजे MMR भागातून 63 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. याशिवाय 2 रुग्ण औरंगाबादमध्ये तर प्रत्येकी 1 रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे.
आज राज्यात 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या 4 रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
आतापर्यंत कुठे सापडले कोरोनाग्रस्त रुग्ण?
मुंबई - 235
पुणे ( शहर व ग्रामीण भाग )- 61
सांगली - 25
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा -45
नागपूर -16
यवतमाळ - 4
अहमदनगर -17
बुलढाणा - 5
सातारा, औरंगाबाद प्रत्येकी - 3
कोल्हापूर - 2
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद प्रत्येकी 1
इतर राज्य - गुजरात -1
एकूण 423 त्यापैकी 42 जणांना घरी सोडले तर 20 जणांचा मृत्यू
राज्यात आज एकूण 648 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 10883 नमुन्यांपैकी 10280 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 423 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 42 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38244 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 2138 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
निजामुद्दीनशी संबंधित किती?
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त 1062 व्यक्तींच्या यादीपैकी 890 व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी 576 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 4 जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत.
राजेश टोपे म्हणाले, "राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी 292 टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात 373 टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये 210 टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा 2332 टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.