अहमदनगर, 5 जून : 'राज्याचं घटलेलं उत्पन्न वाढवण्यासाठी टॅक्स वाढवण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. सध्या कोरोनापासून लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जो काही खर्च होईल तो केला जाईल. मात्र खर्च कुठे कमी होईल...कुठून उत्पन्न वाढवता येईल आणि अर्थव्यवस्था कशी पुढे नेता येईल, यावर चर्चा सुरू आहे,' अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. औद्योगिकदृष्ट्या संपन्न राज्य असलेल्या महाराष्ट्राला लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला आहे. महसुली उत्पन्न कमी झालं आहे. लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल होत असला तरी लगेच परिस्थिती बदलणार नाही.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंनी 100 कोटींची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची नवी मागणी
अशा परिस्थितीत राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या करात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. सध्या तरी राज्य सरकारचा कुठलाही टॅक्स वाढवण्याचा विचार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'जनतेला करोनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यास आमचे प्राथमिकता आहे. कोरोना रोखताना राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत निर्णय सुद्धा घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. खर्च कुठे कमी करता होईल. कुठून उत्पन्न वाढवता येईल, यावर चर्चा सुरू आहे,' असं थोरात यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.