नाशिक 22 मार्च : कोरोना व्हायरसमुळे देशभरातलं सगळं चक्रच बंद झालं आहे. छोटे व्यवसाय, दुकाने, कारखाने काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरस हा झपाट्याने पसरत असल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी सगळ्यांनी घरात राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळी कार्यालय बंद ठेवण्यात आली आहे. नाशिकमध्ये असलेला नोटांचा कारखानाही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. करन्सी प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा कारखाना देशात असलेल्या नोटांच्या चार छापाई कारखान्यांपैकी एक आहे. तिथे नोटा, नाणी आणी मुद्रांक निर्मिती केली जाते.
देशात चार ठिकाणी नोटांच्या छापाईच्या प्रेस आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, मध्यप्रदेशात देवास, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी आणि कर्नाटकात म्हैसूर या ठिकाणी नोटांची छपाई केली जाते. नाशिकमध्ये दर दिवशी पाच दशलक्ष नोटांची छपाई होते. नंतर देशभरात या नोटा वितरीत केल्या जातात. या नोटांच्या छापाईसाठी परदेशातून शाई मागवावी लागते.
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ही संख्या अशीच वाढत राहिली तर आपल्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच आता गावा-गावाला जोडणारी एसटी बस बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून ते 31 मार्चपर्यंत राज्य परिवहनची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक ठप्प होणार आहे.
मुंबईची लाईफलाईन थांबली, रेल्वे गाड्याही राहणार बंद
कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लोकल पूर्णपणे बंद न करता यामध्ये ओळखपत्र दाखवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांना प्रवेश दिला जाणार होता. मात्र आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरातील लोकल आणि रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.