अहमदनगर, 2 जानेवारी : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर सध्या काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमक सुरू आहे. काँग्रेसचे औरंगजेब नाही तर छत्रपती आराध्य असतील या शिवसेनेच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि श्रद्धास्थान आहे. या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असं करावं, या शिवसेनेने केलेल्या मागणीला आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसने मात्र विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाज महाराज आमचे दैवत आहेत.. शहराचं नाव बदलल्याने सामान्यांच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? असा सवाल उपस्थित करत ज्यावेळी आपण महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यावेळी सर्वसामान्य माणूस केंद्रभूत मानत त्याच्यासाठी काय चांगलं करता येईल हे काम आपल्याला करायचे आहे,' असं उत्तर बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांना दिलं आहे.
'शहरांची नावे बदलल्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल होणार आहे? या उलट यामुळे जो सामाजिक विद्वेष निर्माण होईल तो फायदेशीर ठरणार नाही, ते उद्दिष्ट आपले नाही. आपण याबाबत चर्चा करू,' असंही थोरातांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशात काही शहरांची नावे बदलली गेली, मात्र यामुळे काही फरक पडला का? निवडणूक आली की लोकांच्या भावनेच्या मुद्यावर राजकारण करायचं काम काहीजण करत असल्याची टीका भाजपाचे नाव न घेता बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Aurangabad, Balasaheb thorat