मुंबई14 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारपासून प्रचारासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्यात ते सर्व महाराष्ट्र पिंजून काढतील. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठकीचा सपाटा सुरू होता. सुरुवातीला कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर राज्यसभा खासदार आणि विधान परिषद आमदारांची बैठक झाली. त्यानंतर उशीरा प्रचार समितीची बैठक होणार आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास असल्याने महाराष्ट्रात निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना आहेत. त्यामुळे ते तातडीने निर्णय घेऊ शकतात. शिवसेनेसोबतची युती, सुजय विखेंचा भाजप प्रवेश असे अनेक निर्णय घेऊन त्यांनी भाजपची बाजू भक्कम केली.
आघाडीत भांडण
युतीची प्रचाराची जोरात तयारी सुरू असताना आघाडीत धुसफूस सुरू आहे. विखे आणि पवार यांचं राजकीय भांडण महाराष्ट्राला नवं नाही. आता त्यावर पुन्हा एकदा चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिलंय. बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव करा असं काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांनी सांगितं होतं. पवारांनी ती जबाबदारी पार पाडली असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
आव्हाड म्हणाले, काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पवार यांनी ती जबाबदारी पाडली. त्यात वयक्तिक असं पवारांचं काहीही नव्हतं. विखे यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये आणि भाजप सोबत हातमिळवणी करणाऱ्यांनी आघडी धर्माबद्दल बोलू नये.
काय म्हणाले विखे?
विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुलगा डॉ. सुजय विखे - पाटील यांच्या भाजप प्रवेशासह अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळेस विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वैयक्तिक विधानांमुळे दुखावला गेल्याचे वक्तव्य केले.
नगरच्या जागेवरुन हा सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला, असं बोलणं मुळात चुकीचे आहे. नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सलग तीन वेळा पराभव झाला आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसला मिळाली असती तर आघाडीची एक जागा वाढेल, हे त्यामागील गणित होतं, असे स्पष्टीकरण विखे-पाटील यांनी दिलं.
शरद पवारांनी माझ्या वडिलांबाबत केलेलं विधान दुर्दैवी असून जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहबे. पवारांनी अशा प्रकारे टिप्पणी करायला नको होती. मुलानं केलेल्या भाजप प्रवेशावर मी उत्तर हायकमांडला देईन.तसेच अहमदनगरमध्ये मी कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. सुजयचा भाजप प्रवेशाचा निर्णय वैयक्तिक होता. अशा शब्दात विखे - पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.