कोल्हापूर, 9 ऑगस्ट: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकार भानावर आलं आहे. मनगुत्ती येथे हटवण्यात आलेला पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनानं दिलं आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून 8 दिवसांत पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकट्या तेजसला वाढदिवसानिमित्त दिलं अनोखं गिफ्ट
येत्या 8 दिवसांत ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात बैठक होणार असून पुतळा बसवण्याची तारीख ठरवण्यात येणार आहे. मात्र, बेळगाव प्रशासनानं 8 दिवसांत शिवरायांचा पुतळा बसवला नाही तर 9 व्या दिवशी गावकरी पुतळा बसवतील, अशी मनगुत्ती येथील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने गावातील चौकात जमले आहेत.
महाराष्ट्रात तिव्र पडसाद...
बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापलं होतं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे तिव्र पडसाद उमटले होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, जळगावसह राज्यभरात ठिकठिकाणी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. एवढंच नाही तर शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मराठी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
दरम्यान, मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद चांगलाच पेटला आहे. मनगुत्ती येथील आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मनगुत्ती गावामध्ये रविवारी मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केलं. मात्र, कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता मराठी भाषिकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे मनगुत्ती गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
पोलिस अधीक्षक निम्बर्गी हे मनगुत्ती गावात दाखल झाले होते. गावात सध्या सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी सीमाभागातल्या मराठी बांधवांनी केली आहे.
दुसरीकडे, भाजपचे नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केलं आहे. बेळगावात शिवरायांचा पुतळा काँगेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केली आहे. आता नितेश राणे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस काय स्पष्टीकरण देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा...शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण, आता भाजपने शिवसेनेवर साधला निशाणा
काय आहे प्रकरण...
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात 5 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. विशेष म्हणजे, मनगुत्ती ग्रामपंचायतीची परवानगी असतानाही कर्नाटक पोलिसांनी शनिवारी रातोरात शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला.या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.