मुंबई, 26 फेब्रुवारी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) आणि इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकार सातत्याने दुर्लक्ष होत आहे त्याच्या विरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण (Indefinite hunger strike of Samhaji Raje) करणार आहेत. खासदार संभाजीराजे हे आंदोलनाला एकटे बसणार असले तरी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून मराठा तरुण मुंबईत दाखल होत आहेत. (Chhatrapati Sambhaji Raje indefinite hunger strike live updates in mumbai azad maidan for Maratha reservation)
मुंबईतील डबेवाला असोसिएशनचा पाठिंबा
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल ट्विट करत म्हटलं, "मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी उद्या पासून आझाद मैदान येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणास बसायचा निर्णय घेतला आहे. याला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्पुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज 'मुंबई येथील मुंबई डबेवाला'असोसिएशन यांनी पाठिंब्याचे पत्र दिले."
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी उद्या पासून आझाद मैदान येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणास बसायचा निर्णय घेतला आहे. याला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्पुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज 'मुंबई येथील मुंबई डबेवाला'असोसिएशन यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. pic.twitter.com/qPE99tOuF7
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 25, 2022
विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन सरकारी नोकरी देण्याचा निर्णय शासन घेऊ शकते.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 22, 2022
मराठा बांधवांना अटकाव करू नये
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसायचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती ! असं ट्विट दोन दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी केलं होतं.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसायचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती !@Dwalsepatil @DGPMaharashtra
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 24, 2022
संभाजीराजेंचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात खासदार संभाजीराजे यांनी आपण आमरण उपोषण करणार असल्याचं म्हटलं होतं.
वाचा : यशवंत जाधव यांच्या घरी 24 तासांनंतरही आयकर विभागाची छापेमारी सुरूच
संभाजीराजेंच्या पत्रात काय म्हटलं होतं?
5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र आज आठ महिने उलटले तरी या मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसत नाही. यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे. समाजाच्या या मागण्या, त्यांची सद्यस्थिती व समाजाची अपेक्षा पुढीलप्रमाणे :
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाला स्थगिती देण्याआधी शासकीय सेवेत ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया झालेली आहे, त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. सरकार दरबारी गोंधळ असल्याने महावितरण आणि MPSC मार्फत निवड झालेले विद्यार्थी 'आम्हाला न्याय मिळवून द्या' म्हणून दररोज मला 400 ते 500 मेसेज करतात. सरकार EWS मध्ये नियुक्ती देण्याचे सांगत असून ते अशक्य आहे. त्यामुळे ESBC, SEBC व EWS मध्ये वाद निर्माण होईल. हीच बाब महाधिवक्त्यांना सांगून थकलो आहे. त्यांनीच सांगावे की हा गोंधळ कशामुळे निर्माण झालेला आहे, आणि सरकार यावर कोणता ठोस मार्ग काढणार यावर स्पष्टीकरण देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी.
सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी 1000 कोटींचा निधी मागितला असता तो निधी एकदम न देता सारथीच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करून आवश्यक तितका निधी वेळोवेळी सारथी संस्थेला वर्ग करू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही तसा कोणताही आराखडा तयार करण्यात आलेला नसून, सारथी संस्थेला निधी देखील मिळालेला नाही. शासनाने संस्थेला आगामी अर्थसंकल्पातून किती निधी देणार हे स्पष्ट करावे. सारथी संस्थेचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथी संस्थेचे महसुली विभागवार कार्यालये व कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी होती. मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समवेत पुणे येथे बैठक होऊन आमच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या 15 मागण्या मान्य केल्या आहेत; त्यानुसार सारथीचे उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरू करण्यात आले असून या केंद्राला पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. जागा हस्तांतर प्रक्रिया पूर्ण नाही. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग येथील मराठा युवकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम या केंद्रातून सुरू होणे आवश्यक आहे. सारथीचा कारभार नव्याने सुरू झाल्यानंतर नाशिक येथे वसतिगृह इमारत प्रस्ताव, जागेचा प्रस्ताव, पुणे येथे पार्वती, एफ सी रोड येथील जलसंपदा विभागाची जागा यांचे प्रस्ताव शासनाकडे गेले असून त्याचा हस्तांतर निर्णय झालेला नाही.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा 25 लाख रुपये करण्यात यावा, या मागणीवर सरकारने सकारात्मकता दाखवली होती. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच महामंडळाला जाहीर केलेल्या 400 कोटी रूपयांच्या भागभांडवलापैकी केवळ अंदाजे 30 ते 50 कोटी रूपये मिळाले असतील. इतर रक्कम देण्याचा शासन निर्णय
निघाला, मात्र तेही अजून मिळालेले नाहीत. महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकिय निर्णय घेण्यासाठी तसेच नविन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ असणे गरजेचे आहे. तसेच सध्या महामंडळाचे सदस्य सचिव तथा कार्यकारी संचालक शासकिय अधिकारी देखील नाही. महामंडळास कायमस्वरुपी कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, याबाबतीत मान्य केलेल्या सर्व मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात.
मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने 23 वसतिगृहांची यादी जाहीर केली होती. त्यापुढे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. अशोक चव्हाण यांनी 15 ऑगस्ट या दिवशी 14 वसतिगृहांचे उद्घाटन करण्याची घोषणा केली होती. त्यातील ठाणे येथे एका उद्घाटनाचा अपवाद वगळता कुठेही उद्घाटन झालेले नाही. सोलापूर, नाशिक, पुणे याठिकाणी वसतिगृह सुरू करण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहेत. शासनाने सर्व वस्तीगृहे तात्काळ शासकिय प्रक्रिया करुन हस्तांतरण करून उपयोगात आणावेत. शासन हा निर्णय लगेच घेऊ शकते.
कोपर्डी खटल्याचा निकाल 2016 रोजी लागला असून आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. 2018 मध्ये आरोपींनी या विरूद्ध उच्च न्यायालयात अपील केले, हा कायदेशीर भाग आहे. सरकारने या प्रकरणात अर्ज देऊन खटल्याचा निकाल लवकर लावण्याची मागणी करणे गरजेचे आहे. या मागणीवर, न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर लगेचच अर्ज दाखल करू, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही सरकारने अर्ज दाखल केलेला नाही. तो अर्ज दाखल करून विशेष वकिलांच्या माध्यमातून केसवर लक्ष ठेऊन पिडीतेला न्याय मिळवून द्यावा.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा सरकारनेच केली होती. मात्र कुणालाही नोकरी दिलेली नाही. याउलट काही वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे प्रस्तावित केले जात आहे, हे समाजाला मान्य नाही. विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन सरकारी नोकरी देण्याचा निर्णय शासन घेऊ शकते.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर व न्या. दिलीप भोसले समितीच्या शिफारशी पाहता, न्या. गायकवाड आयोगाच्या प्रमुख शिफारशी ज्या कारणासाठी न्यायालयाने अमान्य केल्या आहेत, त्या लक्षात घेता न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता राज्य सरकारला मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण व शिक्षण व नोकरीतील प्रतिनिधित्व न्यायालयीन निर्णयाप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुनर्विलोकन करावे लागणार आहे. त्यातून पुढील दिशा व कृती ठरविणे गरजेचे आहे. हे अद्यापि प्रगतीपथावर नसून त्यात अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. न्या. भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुद्दे शासनाने गांभिर्याने घेतले नसल्याचे दिसते.
अशापद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक मागास सिद्ध करावे लागेल, तरच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल. यासाठी, संसदेत 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर बोलताना मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे की, इंद्रा साहनी खटल्यात ठरविलेली 50% हून अधिक आरक्षण देण्यासाठी लागणारी अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच दूरवर व दुर्गम (Remote & Far-flung) भागाची व्याख्या केंद्र सरकारने बदलावी व मराठा समाजास आरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर करावा. कारण, आधुनिकीकरणामुळे आता दूरवर व दुर्गम असे भाग राहिलेले नाहीत. मात्र तरीही काही असामान्य परिस्थितीमुळे अनेक राज्यांतील समाजघटक शिक्षण व नोकऱ्यांपासून वंचित राहिलेले आहेत. अशा परिस्थितीला अपवादात्मक परिस्थिती ठरवून या वंचित समाजघटकांना केंद्र शासनाने आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा.
तथापि मराठा आरक्षण मिळणे ही दीर्घकालीन व न्यायालयीन प्रक्रिया आहे. मात्र तोपर्यंतच्या काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये, होणाऱ्या अन्यायाची तीव्रता कमी व्हावी, यासाठी सकल मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आमचा हा लढा आहे.
लोकप्रतिनिधी या नात्याने आपण वरील प्रश्न शासकीय पातळीवर सोडवू शकतो. गरीब मराठा समाजासाठी आपण यामध्ये नक्कीच पुढाकार घ्याल, ही अपेक्षा बाळगतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.