अद्वैत मेहता, प्रतिनिधी
पुणे, 29 डिसेंबर : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे भीम आर्मीने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
चंद्रशेखर आझाद यांची पुण्यातील sspms मैदानावर सभा होणार होती. परंतु, जागा मालकाने परवानगी दिल्याचं पत्र आयोजकांनी दाखवावं, असं पुण्याचे पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी सांगितलं होतं. परंतु, sspms मैदानावर सभा घेण्याबाबत जागा मालकाने भीम आर्मीला परवानगी नाकारली आहे.
सुरुवातीला या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सभेची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. जागा मालकाने परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मीने आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भीम आर्मीचे दत्ता पोळ हे मुंबईला रवाना झाले असून रविवारी सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांना मुंबईतील मालाडच्या मनाली हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनाली हाॅटेलमध्ये जाऊन चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली.
या भेटीनंतर आव्हाड यांनी न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी संवाद साधला. "त्याला हाॅटेलमध्ये डांबून ठेवणे चुकीचे आहे. राज्यात त्याच्यावर एकही गुन्हा नाही. तरीही त्याला डांबून ठेवण्यात आलं आहे. संविधान मानणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशी कारवाई करणे हा संविधानाचा अपमान आहे", अशी टीका आव्हाड यांनी केली होती.
===============================================