मुंबई, 16 सप्टेंबर: राज्यात महामार्ग तसेच विविध रस्त्यांवर घडणाऱ्या अपघातानंतर उपचार न मिळाल्याने शेकडो जण मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मजुंरी मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्यातील तत्कालीन शिवसेना -भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल चार वर्षांनी अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
रस्ते अपघातातील जखमींचा जीव वाचवा यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यात 74 वेगवेगळ्या अपघाताचा समावेश करण्यात येईल. या योजनेसाठी 125 कोटी खर्च अपेक्षित असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा...संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्त्व करावं, शिवसेना खासदाराचं साकडं
-रुग्णांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून वा खासगी रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल.
-रुग्णालयात (कॅशलेस हॉस्पिटलायझेशन) तात्काळ दाखल करण्याची सोय.
-अपघातातील रुग्णावर तीन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार.
-रुग्णाला घरी वा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहोचविण्याची जबाबदारी.
-यासाठी एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकेचा खर्चही सरकार करेल.
-30 हजार रुपयांच्या विमा संरक्षणांतर्गत जखमीला रुग्णालयात दाखल करणे, नर्सिग, शस्त्रक्रिया, वैद्यकीय सल्ल्याचा खर्च तसेच रक्त व ऑक्सिजन पुरवठय़ाचा खर्च.
-योजनेच्या लाभासाठी वयाची अट नाही.
या नागरिकांना मिळणार नाही योजनेचा लाभ
स्वत:ला जाणीवपूर्वक जखमी करून घेतलेली व्यक्ती, दारूच्या अमलाखालील व्यक्ती अथवा राज्याबाहेर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी विमा संरक्षण मिळणार नाही. या योजनेसाठी किती विमा प्रीमियम भरला जाणार आहे हे अद्याप निश्चित झाले नसले तरी जखमी व्यक्तीवरील उपचारासाठी 30 हजार रुपये खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती
महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.
हेही वाचा...ठाकरे सरकारचं कडक धोरणं; शासकीय कामकाजात मराठी वापरासाठी घेतला निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय...
-राज्यात कृषि महोत्सव योजना राबविण्यास मान्यता.
-पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार. पदभरतीसाठी वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्याचा निर्णय.
-स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय.
-अंबड येथे जिल्हा व तालुका न्यायालय स्थापना व पद निर्मिती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.