मुंबई, 30 ऑक्टोबर: कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्क वापरा, असं आवाहन राज्य सरकार वारंवार करत आहे. मात्र, नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) कठोर कारवाई सुरू केली आहे. मात्र, या दरम्यान, मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्यावर गर्दुल्यानं कोयता उगारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मास्क न वापरणाऱ्यावर मुंबई महापालिकेचा धडक कारवाई सुरू आहे. दरम्यान, जी नॉर्थ विभागाचे सुपरवायझर उन्मेष राणे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा...उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार? काय म्हणाले संजय राऊत
उन्मेष राणे यांनी मास्क न घातल्यानं एकावर कारवाई केली. मात्र, कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचा भाऊ तिथे आला आणि त्यानं थेट उन्मेष राणे यांच्यावर कोयता उगारला. एवढंच नाही तर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नंतर गर्दुल्यानं स्वत:चे कपडे फाडून बीएमसीच्या कारवाईचा विरोधात भर रस्त्यावर तमाशा केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर मुंबईत खळबळ उडाली आहे.
‘मास्क’ न घालणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR
दरम्यान, मास्क न वापरता कारवाईत अडथळा आणल्याबद्दल बीएमसीने गेल्या आठवड्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यातली ही पहिलीच कारवाई समजली जाते. मुंबई महापालिकेने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
प्रथमेश जाधव (वय 29) असं FIR दाखल झालेल्या व्यक्तिचं नाव असून गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न वापरणे आणि कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. IPC186,188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 40 हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहिम राबवून ही कारवाई केली आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र काही लोक अजुनही मास्क वापरण्यात कुचराई करत आहेत. अशा लोकांना चाप लावण्यासाठी महापालिकेने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मास्क न घातल्यास आधी 200 रुपये दंड केला जात होता. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून आता 400 रुपये दंड भरावा लागणार आहे.
महापालिका मुंबईकरांना मास्क वापरण्यासाठी आवाहन करत आहे. परंतु अनेक मुंबईकर मास्कचा वापर करत नाहीत त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांनी सरकारच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर करणं हे अत्यावश्यक आहे असं जगभरातल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याचा प्रताप,बनावट आदेश दाखवून ठेकेदाराला 3 कोटींना लुटले
मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या तीन गोष्टींमुळेच कोरोनाला दूर राखता येतं हे आता सिद्ध झालं आहे. ‘मास्क’ आता बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्याच्या किंमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करा असं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.