परभणी, 23 नोव्हेंबर : 'महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन महिन्यात आपलं सरकार येईल. ते कसं हे मी पत्रकारांना कळवतो,' असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असा विश्वास दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. याच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त परभणीत बोलताना रावसाहेब दानवे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
'मराठवाडा पदवीधर मतदारसंघ तीन वेळेस भाजपकडे होता, पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. नाहीतर हा मतदारसंघ आपल्या हातून जात नव्हता. याचा बदला या निवडणुकीत घेऊन भाजपचा उमेदवार पुन्हा निवडून आणायचा आहे,' असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
नांदेडमध्ये फडणवीसांचा घणाघात
'जनतेनं आम्हाला निवडून दिलं पण आपला मित्र बेईमान निघाला. लॉकडाऊन झालं तेव्हा केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले. वेगवेगळ्या योजनांतून लोकांना थेट मदत मोदी यांनी केली. मोदीजी कर्मयोगी आहेत. संकट काळात मोदी मदत करत होते. पण राज्य सरकारमधील बोलघेवडे नेते फक्त टीका करत होते. जे वातावरण देशात आहे तेच वातावरण राज्यात आहे. सध्या 6 जागांसाठी निवडणुका आहेत. आता लोक आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखवतील,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Raosaheb Danve