मुंबई 8 मार्च : लोकसभा निवडणुकीला आता फक्त दोन महिने राहिले आहेत. बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेने युती करत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मात्र असं करताना कार्यकर्त्यांमधले मतभेद कसे मिटवायचे असा प्रश्न या दोनही पक्षांमधल्या जेष्ठ नेत्यांना पडला आहे.
गेली चार वर्ष शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा हे शिवसेनेचं टार्गेट होतं. मोदींच्या प्रत्येक कृतींवर सामनामधून जोरदार टीका करण्यात येत होती. काँग्रेसनेही केली नसेल एवढी टीका शिवसेनेने भाजपवर केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली होती.
नाहीतर चालते व्हा...
कार्यकर्त्यांमधली ही कटुता कमी कशी करायची असा प्रश्न आता भाजप आणि सेनेच्या नेत्यांना पडला आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंविरुद्ध दंड थोपटले आहेत तर अनेक मतदारसंघात भाजपचे नेते शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देतील की नाही अशी शंका आहे.
त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना युतीच्या उमेदवाराठी काम करा अस दम भरला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागा असं आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं होतं. हे मतभेद दूर व्हावेत यासाठी दोन्ही नेत्यांच्या काही बैठकाही झाल्या आहेत.
एकदिलाने निवडणूक लढले नाहीत तर त्याचा फटका हा दोनही पक्षांना बसण्याची शक्यता आहे. याची जाणीव ज्येष्ठ नेत्यांना असल्यामुळे प्रचार आणि उमेदवारांची घोषणा होण्याआधी सर्व वाद मिटविण्याचा निर्णय भाजप आणि सेनेने घेतला आहे.
SPECIAL REPORT : अमोल कोल्हेंनी शिवसेना का सोडली?