किरण मोहिते, सातारा, 18 सप्टेंबर : 'संविधान माणसाने लिहले...योग्य असेल तर लोकाना न्याय द्या. जातीवरून देशाचे तुकडे करू नका. सरकारने जर निर्णय घेतला नाही तर राजकारणाला राम राम ठोकणार आणि राजीनामा देणार आहे. कोर्ट म्हणजे काय... मला आजपर्यंत समजले नाही... माणसंच असतात ना?' असा सवाल करत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
'मला कुठल्या पक्षाचे लेबल लावू नका. कोणी श्रेय वाद करू नका, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होणार...याला जबाबदार कोण? आघाडी..,तिघाडी.. मला काय घेणं देणं नाही...गोरगरिबांना धारेवर का धरले उत्तर द्या. का बोलू कोणाशी बोलू कशासाठी बोलू... मला हा प्रश्न पडला आहे,' अशा शब्दांत उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केला.
पवार-ठाकरेंवर टीका
साताऱ्यात बोलताना उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री लाभले मग आरक्षण का नाही? हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. गल्लीत लक्ष दिलं नाही ते मुंबईत आणि दिल्लीत काय लक्ष घालणार? ठाकरे बिकरे आणि पवारांचं सरकार नाही, सरकार लोकांचं आहे, कुणी जास्त मिजास करू नये,' अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं आहे.
मराठा आरक्षणावरून विखे पाटलांनीही केली सरकारवर टीका
'मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये नसलेला समन्वयच कारणीभूत ठरला आहे. सरकारने आता फक्त बैठकांचा फार्स निर्माण करून श्रेयवादासाठी वेळ काढू धोरण अवलंबले आहे,' अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.