शिर्डी, 18 ऑगस्ट : 'राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आघाडी सरकारची आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करणं चुकीचं असून जर केंद्र सरकारवरच अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला?' असा सवाल भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही सुजय विखे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून आज दूधदरवाढीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. लोणी गावात माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुजय विखे पाटील देखील सहभागी झाले होते.
'राज्यातील प्रश्न सोडवायची जबाबदारी आघाडी सरकारची आहे..जनतेने नाकारलेलं असताना तीन पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत.. जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा,' असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांवर आरोप
संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय असून आपला जीव धोक्यात घालून काम करणार्या डॉक्टरांचा संजय राऊत यांनी अपमान केला आहे. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही खासदार सुजय विखेंनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही...? असा खरमरीत सवालही खासदार सुजय विखे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Sujay Vikhe Patil