नांदेड, 3 जून : मराठा आरक्षण विषयाचा पूर्ण विचका करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलं आहे. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका म्हणजे तोंडात गोड अन् मनात खोड अशी आहे, असा आरोप भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज येथे केला.
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतीत संवाद साधण्यासाठी शेलार हे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी पुण्यतिथी निमित्तानं परळीला गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आणि कुटुंबीय यांची निवासस्थानी भेट घेतली.
नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, शहर अध्यक्ष प्रवीण साले, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता चिखलीकर, डाँ. संतुकराव हंबर्डे उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मराठा आरक्षण विषयात मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या कथनी आणि करनी यामध्ये फरक आहे. आरक्षण टिकणार असे सांगत होते आणि प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाच्या बाजूने युक्तिवादच केला नाही. गायकवाड आयोगानं समाजाचे संपूर्ण मागासलेपण सिध्द केले, पण त्यातील परिशिष्ट इंग्रजी अनुवादासह न्यायालयात मांडली नाहीत. सर्वांना हातात हात घालून चालले पाहिजे, असे म्हणायचे पण मराठा समाजाच्या प्रतिनिधींंची समन्वय बैठकच घेतली नाही. त्यावर प्रतिक्रिया आल्यावर बैठका घेतल्या. चांगले वकील दिले पण वकिलांना सरकारने माहितीच द्यायची नाही. न्यायालयात वकीलांना हे सांगावे लागले.
हे वाचा - काँग्रेसचा स्वबळाचा नारा; स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार – नाना पटोले
102 व्या घटनादुरुस्तीवर केंद्राने भूमिका स्पष्ट करा म्हणायचे आणि जेव्हा केंद्राने भूमिका मांडली, तेव्हा त्याचे समर्थन न करता आता इंद्रा सहानी निकालावर बोलायचे, आरक्षणाचा कायदा करा, असे सांगत राज्यपाल महोदयांना भेटायचे त्याच दिवशी काँग्रेसचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आरक्षण नंतर मिळाले तरी चालेल पण सवलती द्या, असे म्हणायचे. त्यामुळे अशोक चव्हाण यांची संपूर्ण भूमिका ही तोंडात गोड अन् मनात खोड अशीच आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांचा शेलार यांनी समाचार घेतला.
तसेच अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडताना वेळोवेळी दिखाऊपणा केला. आज ते इंद्रा सहानी निकालाचा फेरविचार करा, असे केंद्र सरकारला सांगत आहेत. मग काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना, स्वतः मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी हे का केले नाही? केंद्रानं ठराव आणि कायदा करून आरक्षण दयावे, असे अशोक चव्हाण सांगत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना, मा. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना का केला नाही ठराव? राज्यपालांना पत्र लिहून राष्ट्रपतींनी आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आहेत. मग कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळता आरक्षण दिले तर ते टिकेल का? असे प्रश्न उपस्थितीत करून आमदार अँड आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धती व भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, Ashok chavan, Maratha, Maratha reservation