सिंधुदुर्ग, 25 मार्च : राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचे म्हणणारे बच्चू कडू यांना भाजप नेत्यानं सुनावलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेस राहुल यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे भाजपने राहुल यांच्याविरोधात रान पेटवलं आहे. अशात शिंदे-फडणवीस सरकारमधील मित्र पक्ष प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारला टोला लगावला आहे. तसंच आपली आमदारकी गेली तर आपल्याला आनंदच होईल, असंही ते म्हणाले होते. यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी बच्चू कडू काही कायदेतज्ज्ञ नाहीत, असं म्हटलं आहे.
काय म्हणाले विनोद तावडे?
राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची वाटते असं म्हणणाऱ्या बच्चू कडू यांच्या विधानाचाही विनोद तावडे यांनी समाचार घेतला. कारवाई चुकीची असल्याचे सांगणारे बच्चू कडू हे काही कायदेतज्ज्ञ नाहीत, असंही तावडे म्हणाले. "भाजप आणि राष्ट्रवादीच्या पहाटेच्या शपथविधी नंतर जर सरकार स्थापन झालं असतं तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या भूमिकेवर आणलं असतं. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादीची भूमिका सोडून काँग्रेसची भूमिका स्वीकारली. सरकार स्थापनेनंतर आपल्या अजेंड्यावर सहकाऱ्यांना आणणं महत्वाचं असतं, खुर्चीसाठी फरफटत जाण चांगलं नसतं." अशी टीका विनोद तावडे यांनी केली.
वाचा - काँग्रेसनंतर ठाकरे गटाला बसणार धक्का? राहुल पाठोपाठ राऊतांचीही खासदारकी जाणार?
"ज्यावेळी काँग्रेसने बाळासाहेबांना 6 वर्षांसाठी मतदानापासून वंचित केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेना काय बोलली होती ते आठवा. मोदी सरकार घटनेप्रमाणे वागत नाही असं एकीकडे बोलायचं आणि घटनेप्रमाणे आणि कायद्याने कारवाई केली तर हे कसं काय केलं अस दुटप्पीपणाने बोलायचं." जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही. ओबीसी समाजाचा राहुल गांधींनी अपमान केला आहे. त्यांना हे शोभत का?माझं आडनाव सावरकर नसून गांधी आहे त्यामुळे मी माफी मागणार नाही. हे राहुल गांधींचे वाक्य कोकणवासीयांना पटणार नाही. लोकशाहीत विरोधीपक्ष मजबूत पाहिजे. पक्ष ही मजबूत नाही आणि नेता ही मजबूत नाही" अशी अवस्था असल्याची टीका तावडे यांनी केली.
बच्चू कडू काय म्हणाले होते?
राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची वाटते. ही घाईघाईत केलेली कारवाई आहे. अशी घाई सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावी. सरकारने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bachchu Kadu, Rahul gandhi, Vinod tawade