नाशिक, 28 नोव्हेंबर : नाशिकमध्ये (Nashik) दोन दिवसांपूर्वी भाजपचे (BJP) मंडळ अध्यक्ष अमोल ईघे (Amol Ighe Murder case) यांच्या निर्घृण हत्येची घटना समोर आली होती. या हत्येप्रकरणी भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "भाजपचे मंडळ अध्यक्ष अमोल ईघे यांची राजकीय आशीर्वादातूनच हत्या झाली आहे. त्यांची हत्या करणारा आरोपी विनोद बर्वे याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे हे उत्तम उदाहरण आहे", असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला.
"गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नाशिक आता गुन्हेगारी नगरी होतेय का? अशी भीती नाशिककरांना वाटतेय. नाशिकमध्ये भाजपच्या मंडळ अध्यक्षाची खुलेआम निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय आशीर्वादाने केली. युनियनच्या वर्चस्वावरुन वाद झाल्याचं स्पष्ट झालंय. आरोपी विनोद बर्वे याने लावलेल्या युनियनच्या बॅनरवर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी विनोद बर्वे याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. भुजबांनी विनोद बर्वेला चांगली जवाबदारी देणार, असं म्हटले होते. हीच जवाबदारी देणार होते का?", असा खोचक सवाल दरेकरांनी केला.
हेही वाचा : भाजपच्या लोकांचा जीवही ठाकरे सरकारनेच वाचवला, गुलाबराव पाटलांना टोला
"आरोपी विनोद बर्वे याच्यासोबत भुजबळ यांचा फोटो आहे. वर्चस्व वादातून हत्या हे यापूर्वी कधीच घडलं नाही. अजूनही तक्रार करु नका, असा भाजप कार्यकर्त्यांना दम देण्यात येतोय. याबाबत पोलीस आयुक्तांनी देखील निष्काळजीपणा केला. पोलीस आयुक्तांना इशारा देतोय. नाशिकची गुन्हेगारी मिटवा. आयुक्तांनी कोणाचे नोकर असल्यासारखे काम करु नये. सत्ता येते जाते", असं दरेकर म्हणाले.
"भुजबळ पालकमंत्री झाल्यावर शहरातील गुन्हेगारी वाढली. या प्रकरणात मोक्का, फाशी अशी शिक्षा अपेक्षित आहे. आरोपी बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही. केस फास्टट्रॅक मध्ये चालवावी. विधानसभेत हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार. या प्रकरणात तथ्य असेल तर पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा", अशी माझी मागणी आहे.
हेही वाचा : BREAKING : राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्र्यांनी दिला स्पष्ट इशारा
"आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचा कार्यकाळ बघितला. आपण भ्रष्टाचाराचा एकही डाग लावून न घेतलेलं सरकार पाहिलं. पण या गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेलं आहे. विकास प्रकल्प ठप्प झाले. अर्ध्या मंत्रिमंडळावर डाग आहे. उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले जनतेने आम्हाला आपलं मानलं. पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही. दोन वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही", अशा शब्दांत दरेकरांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
"निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणार. आम्ही कधी येणार हे सांगणार, थोडं शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने वागणार आहोत. चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकतोय. कोणत्याही प्रकारे नाराजीची चर्चा नाही. जितेंद्र आव्हाड वादग्रस्त विधान करून वातावरण खराब करतात. ते आता मंत्री, त्यांनी जबाबदरीने वागावं", असं दरेकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.