मुंबई, 1 जून : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत एक शक्यता वर्तवली आहे. 'महाराष्ट्रातल्या तीनही पक्षांचा एकमेकांवर विश्वास आहे तोपर्यंत सरकार राहील. एखाद्या पक्षाचा विश्वास नसेल तर त्याला आम्ही काय करू शकतो,' असा सवाल करत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
अमित शहा यांनी नेटवर्क 18 ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत अमित शहा यांनी देशातील कोरोनाची स्थिती आणि केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवरही निशाणा साधला. पण त्याचवेळी आम्ही सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न करणार नाही. नारायण राणेंना बोलण्याचं स्वातंत्र आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला सहकार्य करतोय, अशी भूमिका शहा यांनी स्पष्ट केली.
फडणवीसांनीही केलं होतं भाष्य
'काँग्रेसचे नेते एक बोलतात तर राष्ट्रवादीचे नेते दुसरंच बोलतात. त्यामुळे सरकारमध्ये समन्वय नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी जे म्हटलंय की भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यावर आमचं म्हणणं आहे की आम्हाला सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधातून कोसळणार आहे. आम्हाला सरकारला घालवायचं नाही तर जागं करायचं आहे,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.