तुषार कोहळे, मुंबई, 20 मार्च : 'मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी लिहिलेलं पत्र धक्कादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांबद्दल असं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता गृहमंत्री पदावर राहिले तर चौकशी कशी होईल? त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,' अशी मागणी करत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'गृह विभागात पोस्टिंग ट्रान्सफरबद्दल जे काही घडत होते त्याचा हा कळस आहे. मुंबई पोलीस दलाचं खच्चीकरण करणारी, मानहानी करणारी ही घटना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हे गंभीर प्रकरण परमवीर सिंह यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही जर मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर आहे,' अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडलं आहे.
परमवीर सिंह यांचं स्फोटक पत्र, नेमकं काय लिहिलं?
या पत्रात परमवीर सिंह यांनी मुंबईतील स्फोटकं, सचिन वाझे यांची अटक आणि इतर काही मुद्द्यांवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर घणघाती आरोप केले आहेत.
'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून पैसे वसुली करण्याबाबत बैठका घेतल्या होत्या. तसंच एपीआय सचिन वाझे यांना दर महिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं,' असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
दरम्यान, या सर्व घटनाक्रमामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घटनांमुळे राज्याच्या गृहखात्याची मात्र मोठी बदनामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आगामी काळात कडक पाऊल उचलणार का, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Devendra Fadnavis