पुणे, 22 फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात (Bhima Koregaon riots) कवी वरवरा राव (Varvara Rao) यांना अखेर सशर्त जामीन (Bail) मिळाला आहे. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने होणारा बिघाड (Health Issue) लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) वरवरा राव यांना सशर्त जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाने 81 वर्षीय वरवरा राव यांना सहा महिन्यांसाठी (6 Months) जामीन मंजूर केला आहे. राव यांना युएपीए कायद्याअंतर्गत अटक झाली होती. ते 28 ऑगस्ट 2018 पासून सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत.
न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने सांगितलं की, जामीन मुदतीचे सहा महिने संपल्यानंतर वरवरा राव यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करायचं अथवा जामीन कालावधी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करायचा. कोर्टाने पुढे सांगितलं की, वरवरा राव न्यायालयाच्या प्रक्रियेबाबत सार्वजानिक ठिकाणी कोणतंही जाहीर भाष्य करू शकत नाहीत. शिवाय जामीन कालावधीत ते कोणत्याही सह आरोपींशी संपर्क साधू शकत नाहीत.
दरवर्षी प्रमाणे 1 जानेवारी 2018 रोजीही लाखोंच्या संख्येने दलित समुदाय महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथे विजय दिवस साजरा करण्यासाठी जमला होता. यावेळी अचानक हिंसाचार झाला आणि ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी अनेक वाहनं जाळण्यात आली होती. त्याचवेळी पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक डाव्या संघटनांचे नेते सहभागी झाले होते. पुढे पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव येथील झालेल्या दंगलीला एल्गार परिषदेतील सामाजिक कार्यकर्ते आणि नेते जबाबदार असल्याचं ठरवून अनेकांना अटक केली होती.
(वाचा - पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येचे आदेश सौदीच्या प्रिन्सनेच दिले; अमेरिकेचा दावा)
हा जातीय दंगा खूपच भयानक होता. ज्यामुळे परिसरात कित्येक दिवस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. खरंतर 1 जानेवारी 1818 साली भीमा कोरेगाव याठिकाणी ब्रिटीश आणि पेशवे यांच्यात युद्ध झालं होतं. या युद्धात पेशव्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर दुसरीकडे ब्रिटीश सैन्यात अनेक दलितांचा समावेश होता. त्यामुळे दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने दलित समुदाय याठिकाणी विजयी स्तंभाला वंदन करण्यासाठी येत असतो. पण 2018 साली काही कारणांमुळे दोन गटात दगडफेक होऊन दंगल उसळली होती. याच गुन्ह्याचा ठपका वरवरा राव यांच्यावर आहे.