बीड, 15 जुलै : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यात एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेला आठ दिवस झाल्यानंतर आपल्या तरुण मुलाच्या आत्महत्येच्या विरहातून वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. पंढरीच्या वारीला गेलेल्या या व्यक्तीची ही शेवटची वारी ठरली आहे.
काय आहे घटना -
बीडच्या धारुर तालुक्यातील आसोला येथील एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलगा श्रीकृष्ण मोहन चोले (वय 27 वर्ष) तर वडील मोहन पंढरी चोले (वय 50 वर्ष) यांनी कोळपिंपरी शिवारातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मोहन चोले यांनी मुलाच्या विरहातून हे टोकाचे पाऊल उचलले असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासात स्पष्ट होईल. दरम्यान, मुलगा श्रीकृष्ण याने आत्महत्या केली तेव्हा त्याचे वडील पंढरी चोले हे पंढरपूर येथे वारीमध्ये गेले होते. त्यांना माहिती मिळताच ते गावी आसोला येथे परत आले.
हेही वाचा - पतीला क्रिकेटच्या बॅटने क्रूरपणे मारलं; रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहिला, शेजारी आले अन्...
मात्र, गेल्या शुक्रवारी मुलाने आत्महत्या करुन आठ दिवस होत नाहीत तोच या शुक्रवारी त्याच्या वडिलांनी म्हणजे मोहन पंढरी चोले टोकाचे पाऊल उचलले आहे. मुला पाठोपाठ आठ दिवसातच वडिलांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.