eknathबीड, 8 फेब्रुवारी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाचा राजीनामा देऊन वरळीतून लढण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर शिंदे गटाकडूनही प्रतिआव्हान देण्यात आलं होतं. हा आव्हानाचा खेळ आता थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. "गद्दार सरकार लवकरच कोसळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आव्हान स्वीकारण्याची हिंमत नाही, अशी घणाघाती टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावात शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
बीड जिल्हा दौरावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या संदर्भात विचार केला जात नाही तसेच विस्तार होण्याअगोदर हे अल्पायुशी सरकार पडेल, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी ठाण्यात निवडणूक लढवण्याचं आव्हान देत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. हा डायस जसा हालत आहे, त्याचप्रमाणे हे चालू सरकार हालत आहे. हा डायस ज्यावेळी पडेल तेवढ्या वेळात हे सरकार पडणार असल्याचं भाकित ठाकरे यांनी केलं.
आपल्या राज्यात येणारे उघोग जर गुजरातमध्ये जात असतील तर हे सरकार काय कामाचे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातील महापुरूषांचे अवमान करत आहेत. त्यांना महाराष्ट्रातून काढून देण्याची ताकद मुख्यमंत्र्यात नाही. 8 महिने उलटून गेले. मात्र, अद्याप या सरकारने जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या हिताचे काहीच केले नाही. साधं मंत्रीमंडळात एक महिलेला स्थानही दिलं नाही, अशी टीका यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. ते पुढे बोलताना म्हणाले की, एका बाजूला बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे तर दुसऱ्या बाजूला या गद्दार लोकांचे हिंदुत्व आहे. हे आपल्याला बदलायचे आहे. म्हणून आपण ठरवा, असे आवाहनही यावेळी जनतेला केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, Eknath Shinde