बीड, 19 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप झाल्याने राजकारणात खळबळ उडाली. याप्रकरणी भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू केली आहेत. तसंच अनेक मोठ्या नेत्यांनी उघडपणे धनंजय मुंडे यांची बाजू घेण्याचं टाळलं. मात्र आता राज्यातील ओबीसींचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे बाळासाहेब सानप यांनी याप्रकरणात गंभीर आरोप केला आहे.
'राज्यात ओबीसी समाजातील नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवलं जात आहे,' असं वक्तव्या बाळासाहेब सानप यांनी बीडमध्ये केलं आहे. 'महाराष्ट्रात कोळी समाजाला आरक्षणातून, शिक्षणातून, नोकरीतून आणि राजकारणातून संपवण्याचे कट-कारस्थान ओबीसींच्या लक्षात आले. त्यामुळे आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे,' असा इशाराही बाळासाहेब सानप यांनी यावेळी दिला.
मराठा समाजाची ओबीसी आरक्षणात घुसखोरी होत आहे. केंद्रातील योजना, स्कॉलरशिप, नोकरी यामध्ये ओबीसी समाजाला वंचित ठेवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा घणाघातही सानप यांनी यावेळी केला.
ओबीसींवर अन्याय होत आहे, हे काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लक्ष्यात येते, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांच्या लक्ष्यात कसे येत नाही? असा खरमरीत सवालही बाळासाहेब सानप यांनी ठाकरे सरकारला केला आहे.