चंद्रपूर, 20 नोव्हेंबर : टी वन वाघीण अर्थात अवनी हिच्या बछड्यांनी एका घोड्याची शिकार केली आहे. वनविभागानं बछड्यांसाठी हे सावज बांधून ठेवलं होतं. या बछड्यांनी शिकार केल्यानं त्यांची उपासमार होण्याची भीती नाहीशी झाली आहे.
सरकारच्या आदेशानंतर अवनी वाघिणीला ठार करण्यात आलं. त्यामुळे तिचे दोन बछडे भूक भागवण्यासाठी काय करणार, असा प्रश्न तयार झाला होता. त्यामुळे मग वनविभागाने या बछड्यांची उपासमार होऊ नये, म्हणून हे सावज बांधून ठेवलं होतं.
नरभक्षक म्हणून अवनी वाघिणीला तर मारलं पण आता तिच्या बछड्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित करत वनविभागावर मोठी टीका होत होती. त्यानंतर वनविभागाने या बछड्यांसाठी सावज ठेवण्याचा निर्णय घेतला. अवनीच्या बछड्यांनी हे सावज खाल्ल्यामुळे वनविभागासाठी हा मोठा दिलासा आहे. या बछड्यांनी कक्ष क्र. 655 मध्ये ही शिकार केली आहे.
काय आहे अवनी प्रकरण?
चंद्रपुरातील अवनी ही वाघीण नरभक्षक आहे, असं सांगत या वाघिणीला राज्य सरकारच्या आदेशानंतर ठार केलं गेलं. भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला होता. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं.
‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला होता.
या क्रूर हत्येने दोन बछड्यांना अनाथ केलं आहे, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची भीषणता अधोरेखित केली होती. मनेका गांधी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपला घरचा आहेर दिला होता.